वाक्य संश्लेषण
वाक्यसंश्लेषण
वाक्यसंश्लेषण यालाच वाक्यसंकलन असेही म्हणतात. एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवलवाक्ये दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य बनविणे यालाच वाक्यसंश्लेषण असे म्हणतात.
वाक्यसंश्लेषणाचे तीन प्रकार करता येतात.
दोन किंवा दोनांपेक्षा अधिक केवल वाक्यांचे एक केवल वाक्य करणे.
उदा.
तो रस्त्यावरून चालत होता. त्याचा पाय घसरला. तो पडला.
तो रस्त्यावरून चालत असताना त्याचा पाय घसरून तो पडला. - केवल वाक्य
दोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक संयुक्त वाक्य करणे.
उदा.
मी दुकानातून मोबाईल घेतला. मी दुकानातून टी.व्ही. घेतला.
मी दुकानातून मोबाईल आणि टीव्ही घेतला. - संयुक्त वाक्य
दोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक मिश्र वाक्य करणे.
उदा.
मला हा ड्रेस पाहिजे. तो चांगला आहे.
मला हा ड्रेस पाहिजे कारण तो चांगला आहे. - मिश्र वाक्य
केवल वाक्यांचे एक केवल वाक्य :-
उदा.
१. पुष्कळ वर्षे झाली. मी कॅशियाचे रोप आणले. बागेत एका कोप-यात ते लावले. याची मला मोठी आवड होती.
(पुष्कळ वर्षांपूर्वी मोठ्या आवडीने कॅशियाचे रोप आणून मी ते बागेत एका कोप-यात लावले.)
२. माझ्या मैत्रिणीने मला पत्र पाठवले. त्यात माझे आभार मानले होते.
(माझ्या मैत्रिणीने मला आभाराचे पत्र पाठवले.)
एखाद्या नामचे स्पष्टीकरण करणा-या त्याच अर्थाच्या शब्दास समानाधिकरण असे म्हणतात.
संयुक्त वाक्य बनविणे.
दोन किंवा अधिक केवलवाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविताना त्यांना जोडणारी योग्य अशीच उभयान्वयी अव्यये वापरावयास हवीत.
उभयान्वयी अव्यये ही दोन प्रकारची आहेत.
(अ) प्रधानत्वबोधक
(आ) गौणत्वबोधक
केवळ प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यये योजल्याने बनणारे वाक्य केवळ – ‘संयुक्तवाक्य’ होते.
प्रधानत्वबोधक व गौणत्वबोधक अशी दोन्ही प्रकारची उभयान्वयी अव्यये वापरल्यास ते ‘मिश्र संयुक्त’ वाक्य होते. या दोन्ही प्रकारांना ‘संयुक्त वाक्य’च म्हणतात.
सयुंक्तवाक्ये चार प्रकारची असतात पुढीलप्रमाणे :-
अ) समुच्चयबोधक :- ‘आणि, व’ यांसारखे.
उदा.
रामूचा शाळेत पहिला नंबर आला. शामूचा शाळेत दुसरा नंबर आला.
(रामूचा शाळेत पहिला नंबर आणि शामुचा दुसरा आला.)
आ) विकल्पबोधक :- ‘अथवा, किंवा’ यांसारखे.
उदा.
तू हे पुस्तक वाच. तू हे पुस्तक वाचू नकोस.
(तू हे पुस्तक वाच किंवा वाचू नकोस.)
इ) न्यूनत्व (विरोध) बोधक :- ‘पण, परंतु, परी’ यांसारखे
उदा.
आपण मरावयास हरकत नाही. आपण कीर्तिरुपाने उरावे.
(मरावे परी कीर्तिरुपे उरावे. )
ई) परिणामबोधक :- ‘म्हणून, सबब’ यांसारखे
उदा.
बस उशिरा आली. मला यायला उशीर झाला.
(बस उशिरा आली म्हणून मला यायला उशीर झाला. )
उदा.
१. विजा चमकू लागल्या. पावसाला सुरवात झाली.
विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.
२. लोक आपली स्तुती करोत. लोक आपली निंदा करोत.
लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत.
३. आपण मरावयास हरकत नाही. आपण कीर्तीरुपाने उरावे.
मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
४. वाटेत मोटर नादुरस्त झाली. मला यावयास उशीर झाला.
वाटेत मोटर नादुरुस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला.
५. एकाने माणसे मोजून पहिली. ती नउच भरली.
एकाने माणसे मोजून पहिली, पण ती मोजून नउच भरली.
६. आम्हाला नेण्यासाठी जहाज आले. आम्ही बचावलो.
आम्हाला नेण्यासाठी जहाज आले म्हणून आम्ही बचावलो.
मिश्र वाक्य बनविणे.
जर दोन वाक्ये गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असतील तर मिश्रवाक्य तयार होते.
गौणत्वबोधक उभयान्वयी अव्यये चार प्रकारची आहेत.
अ) कारणबोधक :- ‘कारण, का, की, कारण की’ यांसारखे
उदा.
त्याचा पहिला नंबर आला. त्याने चांगला अभ्यास केला.
(त्याचा पहिला नंबर आला कारण त्याने चांगला अभ्यास केला.)
आ) उद्देशबोधक :- ‘म्हणून, सबब , यास्तव’ यांसारखे
उदा.
शब्द हे दुधारी शस्त्र आहे. शब्द जपून वापरावेत.
(शब्द हे दुधारी शस्त्र आहे, म्हणून जपून वापरावेत.)
इ) स्वरुपबोधक :- ‘की, म्हणून, म्हणजे’ यांसारखे.
उदा.
तो म्हणाला. मी धंदा करीन.
(तो म्हणाला की, मी धंदा करीन.)
ई) संकेतबोधक :- ‘जर – तर, जरी – तरी’ यांसारखे.
उदा.
ते त्याला उमजले होते. ते त्याला पुरते समजले नव्हते.
(जरी ते त्याला उमजले असले, तरी पुरते समजले नव्हते.)
उदा.
१. गुरुजी म्हणाले, पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
गुरुजी म्हणाले कि, पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
२. विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता.
विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता.
३. आमचे शरीर सुदृढ व्हावे, आम्ही योगासने करतो.
आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.
४. उद्या सुट्टी मिळेल. मी तुझ्या घरी येईन.
उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन.
५. भगवान विष्णू धृवाला म्हणाले. मी तुझ्यावर प्रसन्न आहे
भगवान विष्णू धृवाला म्हणाले की, मी तुझ्यावर प्रसन्न आहे.
एकाच वाक्याचे केवल, मिश्र व संयुक्त वाक्यात रुपांतर पुढीलप्रमाणे करता येईल.
आरती सुरु झाली. घंटानाद सुरु झाला.
केवलवाक्य - आरती सुरु झाल्यावर घंटानाद सुरु झाला.
संयुक्तवाक्य - आरती सुरु झाली आणि घंटानाद सुरु झाला.
मिश्रवाक्य - जेंव्हा आरती सुरु झाली तेंव्हा घंटानाद सुरु झाला.
Comments
Post a Comment